जनजीवन पूर्व पदावर आणण्यासाठी तातडीने पावले उचला  - आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्तांकडे मागणी 


पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील जाहिर केलेला लॉकडाऊन तातडीने हटवून जनजीवन पूर्व पदावर आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.             आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात, नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा उहापोह केला आहे. त्यांनी निवेदनातून म्हंटले आहे कि, पनवेल महानगरपालिका हद्दीत सुरुवातीच्या काळात केंद्र शासनाने जाहिर केलेला व महाराष्ट्र शासनाने वाढवलेला असा लॉकडाऊन हा २४ मार्च ते ३१ मे पर्यत सुरू राहिला. काही प्रमाणात मे महिन्यात व नंतर जून महिन्यात उद्योग, व्यवसाय व व्यापार यांची गाडी रूळावर येते ना येते तोच कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या नावाखाली ३ जुलै पासून पुन्हा लॉकडाऊन जाहिर झालेला आहे.मुळातच लॉकडाऊन हे कोरोनाचे संक्रमण थांबण्यावरचा उपचार नाही, हे विविध क्षेत्रातील अनेक तज्ञांनी वारंवार बोलून दाखवले आहे . नागरिकांनी लॉकडाऊनच्या सुख्वातीच्या काळात मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणे (हात साबणाणे वारंवार स्वच्छ धुणे) व एकमेकांपासून किमान ३ फुटांचे शारिरिक अंतर पाळणे या सवयी लावून घेणे अभिप्रेत होते. मात्र सुरूवातीच्या काळात महाराष्ट्र सरकारकडून पनवेल परिसरातून अत्यावश्यक सेवेमध्ये दैनंदिन कामासाठी मुंबईमध्ये जाणाऱ्या लोकांपासून त्यांच्या परिवारांना होणारे कोरोनाचे संक्रमण थांबण्यात अपयश आल्यामुळे पनवेलमधील कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे मात्र एकीकडे मुंबईमध्ये रूग्णांची संख्या रोज वाढत असताना संपूर्ण जुलै महिन्यात तिथे लॉकडाऊन नाही, मात्र पनवेल महापालिकासारख्या क्षेत्रात लॉकडाऊन लागू केला आहे. सदर लॉकडाऊनच्या कालावधीत सातत्याने वाढ करून महानगरपालिका उद्योजकांचा व व्यापाऱ्यांचा अंत पाहत आहे. सर्वसामान्य नागरिकांना देखील लागणाऱ्या दैनंदिन गरजेच्या वस्तु कशा पद्धतीने मिळवाव्यात असा प्रश्न पडतो आहे . दुकान उघडल्याशिवाय ज्यांचा व्यवसाय होवू शकत नाही असे दुकानदार तसेच वेगवेगळ्या पद्धतीच्या सेवा पुरवणाऱ्या संस्था याठिकाणी काम करणाऱ्या लोकांच्या रोजगारावरती या लॉकडाऊनचा अनिष्ट परिणाम जाणवू लागला आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत १५० ते २०० च्या घरात वाढणारी रोजची रूग्ण संख्या पाहता या रूग्ण संख्येला आवश्यक असणारे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देण्याची महापालिका अधिकाऱ्यांची धडपड ही अपुरी पडते आहे अशी नागरिकांमध्ये स्पष्ट भावना आहे.         या परिस्थितीमध्ये रूग्णांसाठी जास्तीत जास्त वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे आणि रूग्णांच्या संपर्कात आलेल्या तसेच संभाव्य रूग्णांची स्वॅब टेस्ट तसेच रॅपिड अँटीबॉडी टेस्ट जास्तीत जास्त प्रमाणात वाढवणे याला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. तसेच ज्या उद्योग, अस्थापनांना आपले काम चालू ठेवायचे आहे, त्यांनी आपल्या उद्योगातील कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे व त्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या उपचाराचा खर्च उचलणे हे बंधनकारक करण्याची आवश्यकता आहे. मात्र केवळ लॉकडाऊन करून महापालिका या सर्वापासून सुटका करून घेऊ इच्छिते. याचा पनवेल परिसरातील नागरिकांमार्फत व पनवेल शहरातील विविध घटकामार्फत निषेध केला जात आहे. जनसामान्यांचा विचार करून महानगरपालिका हद्दीतील लॉकडाऊन तातडीने हटवून जनजीवन पूर्व पदावर आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अन्यथा भारतीय जनता पार्टीला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या निवेदनातून अधोरेखित केले आहे.